मोहोळ, दिनांक, २३ सप्टेंबर २०२५
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी शिंगोली तरटगाव, पीर टाकळी, विरवडे, कामती, लांबोटी आदी गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे, घरांचे तसेच जनावरांच्या नुकसानीचे पाहणी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे पिके वाहून गेली, मातीचे अपरिमित नुकसान झाले. अनेक घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाकडून मदत मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकरी व नागरिक गंभीर आर्थिक संकटात सापडले असून सोलापूर जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच नदी व ओढ्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी खासदार शिंदे यांनी पुढील मागण्या व उपाययोजना मांडल्या –
१. सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत.
२. जनावरांसाठी चारा व सुग्रास तातडीने पुरवठा करण्यात यावा.
३. बाधित नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावे.
४. घरांची पडझड व पिकांचे नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
५. शिंगोली, तरटगाव, विरवडे बु. येथे जनावरांसाठी सुग्रास व चारा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले.
६. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून नव्याने कर्जपुरवठा करण्यात यावा.
७. गरजूं स्थलांतरित नागरिकांसाठी अन्न व चादरींची व्यवस्था तातडीने करण्यात यावी.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अन्यथा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण उपोषण करण्यास बाध्य होऊ, असा ठाम इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.
या पाहणीवेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, समन्वयक मनोज यलगुलवार, सीमाताई पाटील, अशोक भोसले, सुरेश हावळे, अविनाश टेळे, अनिकेत पाटील, शिवप्रसाद पाटील, महादेव ब्रदशेट्टी, सुनील पवार, स्वप्नील शिंदे, ऋषिकेश गुंड, विकास जाधव, सर्जेराव पाटील, सचिन अवताडे, भारत गुंड, सौदागर साठे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments