महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आज पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे राज्य संघटक तथा सांगली येथील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि दैनिक 'जनप्रवास'चे समूह संपादक संजयजी भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी नुकताच उधळून लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूलं, चार जिवंत काडतूसं आणि धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हे आरोपी फेब्रुवारी महिन्यापासून भोकरे यांची रेकी करत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांना तातडीने 'झेड प्लस' दर्जाचे पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या कार्यालयास निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके-पाटील व पंढरपूर शहराध्यक्ष शंकरराव कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाधिका-यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी पत्रकार संतोष मोरे, अतुल मोरे, शुभम कोरके, रोहन नरसाळे, कुमार कोरे, धनजंय राक्षे, संजय ननवरे, महेश कदम, प्रमोद भोसले, विक्रम कदम, प्रमोद बाबर, समाधान वनसाळे, नितीन करंडे यांच्यासह पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे की, साधारण वर्षभरापूर्वी सिद्धार्थ संजय भोकरे यांना देखील जीवे मारण्यासाठी पुण्यामधून कट रचण्यात आला होता आणि त्या संदर्भात त्यांना धमकीचे पत्रही प्राप्त झाले होते. यावरून हे स्पष्ट होते की, भोकरे कुटुंबीय हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या निशाण्यावर आहेत.
सध्याच्या कारवाईनंतर संजयजी भोकरे यांनी स्वतः 'प्लॅन बी' नुसार पुन्हा हल्ला होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. गुन्हेगारांचे धाडस पाहता, त्यांचा 'प्लॅन बी' कार्यान्वित होण्यापूर्वीच शासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या जमिनी हडपण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
संजयजी भोकरे यांना त्यांच्या जिवाला असलेला गंभीर धोका लक्षात घेऊन तातडीने 'झेड प्लस' (न+) दर्जाचे पोलीस संरक्षण प्रदान करण्यात यावे, वर्षभरापूर्वी सिद्धार्थ भोकरे यांना मिळालेल्या धमकीचा आणि आताच्या कटाचा आपसात काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी व्हावी, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि या कटामागील मूळ 'बोलवता धनी' कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या मागणीसाठी अत्यंत आग्रही असून, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भोकरे यांना त्वरित कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी केली आहे.

0 Comments