पंढरपूर : भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. या स्थलांतरित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या डॉ. सौ. प्रणिता भगीरथ भालके यांनी भोजन व्यवस्थेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना त्यांनी दिल्या.
या प्रसंगी मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पूरपरिस्थितीत प्रशासन आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या समन्वयातून नागरिकांना वेळेवर मदत व भोजन उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पूरपरिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

0 Comments