LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूरमध्ये वारकऱ्यांवरील लाठीमारचा ‘आप’कडून निषेध


पंढरपूर (प्रतिनिधी) : आळंदीहून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना वारकऱ्यांना पोलिसांनी लाठीमार केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. आम आदमी पार्टीने याचा तीव्र शब्दात निषेध केला असून, यासंदर्भात शिंदे-फडवणीस सरकारने वारकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात पंढरपूरमध्ये आम आदमी पार्टीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष एम. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले उपस्थित होते.

विठू माऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी या पालखीमध्ये सामील होतात. माऊलींच्या पालखी परंपरेला गालबोट लागणारी घटना घडल्याचे आजवर कधीही समोर आलेले नाही. पोलिसांनी लाठीमार व बळाचा वापर केला. हे करण्यासाठी पोलिसांना आदेश कुणी दिले होते? गृहमंत्रीपद सांभाळणारे फडणवीस यांनी याबाबत दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे मत आम आदमी पार्टीकडून व्यक्त करण्यात आले.

२०१८ मध्ये भाजप सत्तेत असताना वारीमध्ये साप सोडला जाण्याची भीती व्यक्त करून वारकऱ्यांमध्ये गोंधळ उडवला गेला होता. आताही भाजप आणि शिंदे गट सत्तेत असताना ही घटना घडली आहे. वारकऱ्यांसोबतचा लाठीमार आणि बळाचा वापर होताना भाजपच्या खऱ्या मानसिकतेचे दर्शन जनतेस झाले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांना त्रास देणाऱ्या सनातनी मानसिकतेचेच हे प्रतिबिंब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

आम आदमी पार्टी या लाठीमाराचा निषेध करीत असून, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारकरी संप्रदायाची सपशेल माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तालुका अध्यक्ष बंडू मोरे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष संभाजी गांडुळे, शहर अध्यक्ष श्रीरंग बागल आदींसह ‘आप’चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments