माजी आमदार प्रशांत परिचारक यांची बांधकाममंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी.
पंढरपूर (प्रतिनिधी) - तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार प्रमुख यात्रा काळात तसेच शेतीपूरक मालवाहतुकीसाठी तालुक्यातील भीमा नदीपात्रावर अजनसोंड ते मुंढेवाडी असा पूल बांधावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री रवींद्र चव्हाण पंढरपूर येथे विविध पाहणी करण्यासाठी ना. रवींद्र चव्हाण आले होते. यावेळी विश्रामगृह येथे मा. आ. प्रशांत परिचारक यांनी त्यांच्याशी विकासकामांचा चर्चा केली. श्री चव्हाण यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री समाधान आवताडे उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड ते मुंढेवाडी पुल बांधल्यास त्या भागातील शेतकऱ्यांची ऊसाची वाहतुक, शेतमालाची वाहतूक, अन्य कृषी उत्पादने व शेतीपुरक मालाचे विक्रीसाठी दैनंदिन वाहतुक सुलभ होणार आहे. तसेच तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. त्यावेळी शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
त्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, भाविक यांची सोय होण्याकरीता भिमानदीवर पुल बांधणे गरजेचे असल्याचे प्रशांत परिचारक यांनी सांगितले. पंढरपूर शहरालगत वाखरी ते देगाव या रिंगरोडचे ( बायपास) रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सुरू आहे. परंतु देगाव शेगाव दुमाला अजनसोंड मुंढेवाडी कोंढारकी अनवली - कासेगाव कोर्टी पर्यंतच्या रिंगरोडचे काम अद्याप पर्यंत झालेले नाही. परंतु भविष्यात हा रिंग रोड होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरील अजनसोंड ते मुंढेवाडी पुलाचे काम झाल्यास वारी काळात या रस्त्याचा वापर होणार आहे. तसेच सुस्ते देगाव शेगावदुमाला अजनसोंड मुंढेवाडी कोंढारकी यापरिसरातील पुलाचा अनवली नागरिकांना या वाहतुकीसाठी व शेतीमालाच्या वाहतुकीस उपयोग होणार आहे. तसेच अहमदनगर बार्शी-कुर्डुवाडी सोलापूर विजापूर कोल्हापूर सांगली याभागातून येणाऱ्या लांब पल्यांच्या वाहतुकीसाठी हा पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध होणार असून वाहतुक कोंडीचा अडथळा दूर होणार आहे. त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे अजनसोंड ते मुंढेवाडी पुल बांधणेसाठी लेखी निवेदनाव्दारे मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.


0 Comments