पंढरपूर: ‘आपण निर्माण केलेले उत्पादन हे समाजातील सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे असावे. यासाठी अभियंत्यांनी स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन दृष्टीकोनातून संशोधनाचा विचार करावा तसेच नेतृत्व करत असताना सोबत असणाऱ्या सर्वांना विचारत घेवून त्यांच्या कल्पनांना वाव द्यावा. अभियंत्यांनी संशोधन करताना नवीन संकल्पनांना प्रथम प्राधान्य द्यावे. स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील संशोधनाकडे गंभीरतेने पाहणे आवश्यक आहे. यातूनच भविष्यात उद्योजक घडतात. यशस्वी उद्योजक हे आत्मनिर्भर भारतासाठी गरजेचे आहेत.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी सदस्य तसेच स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एन.बी.पासलकर यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या इलाईट क्लबतर्फे आयोजित ‘टेक निर्माण १.०’ हा सलग २४ तासांचा राष्ट्रीय स्तरावरील हार्डवेअर हॅकेथॉन उपक्रम दि. १६ ते दि.१७ मार्च दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी सदस्य व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एन.बी.पासलकर हे मार्गदर्शन करत होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांमधील ६० हून अधिक संघांतील २२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने आणि उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एन.ए.तळवळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘टेक निर्माण १.०’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘ज्ञान हाच प्रकाश आहे’ या संदेशातून नवकल्पनांना प्रेरणा देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटी, कला, डिझाइन आणि तंत्रज्ञान (आर्ट्स, डिझाइन अँड टेक्नोलॉजी) अर्थात एडीटी युनिव्हर्सिटीच्या डॉ.वृषाली रामपुरे, या उपस्थित होत्या. बिदर(कर्नाटक) येथील गुरुनानकदेव इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा.राजेंद्र कुलकर्णी यांचीही उपस्थिती लाभली. विभागाच्या प्रमुख डॉ. एन.ए.तळवळकर यांनी विभागाची माहिती व ‘हॅकेथॉन’चे उद्दिष्ट स्पष्ट केले. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती यांनी ‘आयट्रिपलई’ उपक्रमांचा आढावा सादर केला. कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा.प्राजक्ता तुपारे यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग समाजपयोगी गोष्टीसाठी झाला पाहिजे आणि या हार्डवेअर हॅकेथॉन मधील प्रोजेक्ट्स मधून दिसले पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केले. या हॅकेथॉन उपक्रमासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड, नाशिक, लातूर आणि कर्नाटक राज्यासह इतर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांनी सस्टेनेबल एनर्जी, हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, अॅग्रीकल्चर, ऑटोमेशन, डिजास्टर मॅनेजमेंट अँड सेफ्टी तसेच ओपन इनोव्हेशन या विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. प्रारंभी सादरीकरणाद्वारे कल्पना मांडल्यानंतर विद्यार्थ्यांनी सलग २४ तास मेहनत घेऊन आपल्या संकल्पनांचे प्रत्यक्ष हार्डवेअर प्रोटोटाइप विकसित केले. या उत्कृष्ट कल्पनांना पुढील स्तरावर नेण्यासाठी दि. १८ मार्च रोजी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. स्वेरीचे डॉ. पी. आर. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘हार्डवेअर हॅकेथॉन पासून स्टार्टअप फंडिंग, भांडवल उभारणी आणि प्रभावी आर्थिक व्यवस्थापनाकडे संक्रमण’ करण्याची कला आत्मसात करून घेतली. समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरीचे माजी विद्यार्थी असलेले व विप्रो रोबोटिक्सचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले रितेश चव्हाण उपस्थित होते तसेच मान्यवर म्हणून राज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त वैभव जाधव, बीडीओ सूरज गावडे, ज्ञानदीप अॅकॅडमी, पुणेचे वरिष्ठ प्राध्यापक वैभव खुपसे, मुंबईच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. निनाद मोरे, तसेच सह-विभागप्रमुख प्रा.महूआ बिस्वास, विद्यार्थी समन्वयक जय गाडेकर, कृष्णा लामगुंडे, ‘टेक निर्माण १.०’ मधील इतर प्रतिनिधी, विद्यार्थिनी सचिवा नेहा झिरपे, प्राध्यापक वर्ग व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक रु. १० हजार, द्वितीय पारितोषिक रु. ७ हजार, तृतीय पारितोषिक रु. ५ हजार तसेच मुलींच्या उत्कृष्ट संघासाठी रुपये ३ हजार अशी पारितोषिके यावेळी देण्यात आली. ई-लाईट समिती, संकल्प समिती आणि विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांनी प्रभावी नेतृत्व, उत्कृष्ट समन्वय व व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य, नवोन्मेषाची वृत्ती, संशोधनाभिमुख दृष्टीकोन तसेच संघभावना विकसित झाली असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुष्टी लामगुंडे, यशस्विनी शहा यांनी केले तर आभार प्रा. संगीता जाधव यांनी मानले.
चौकट-
१.स्वेरीतील प्राध्यापक वर्ग, कार्यक्रम प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी शेवटपर्यंत सहकार्य केले. त्यामुळे कमतरता भासली नाही. ज्या ज्या वेळी आम्हाला मदतीची गरज भासली, त्या त्या वेळी विनाविलंब स्वेरीचे प्रतिनिधी मदतीसाठी धावून येत होते. धन्यवाद स्वेरी टीम.
– साक्षी भिंगे, कर्मयोगी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेळवे.
२. आम्ही स्पर्धेसाठी लांबून आलो होतो. इथे आमची सर्व सोय करण्यात आली होती, दोन्ही दिवस उत्तम भोजनाची सोय केली होती. उत्तम नियोजनामुळे आम्ही भारावून गेलो. यापूर्वी स्वेरीचे नाव आम्ही केवळ ऐकून होतो आता अनुभवता आले. या स्पर्धेतून नवनवीन संकल्पना प्रात्यक्षिकातून कशा सादर करायच्या याचे जवळून शिक्षण घेता आले. स्वेरीच्या संयोजकांचे मनःपूर्वक आभार.
-माधव म्हेत्रे, लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मुंबई.

0 Comments