प्रतिनिधी/-
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच विधान भवन येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून प्रत्यक्ष पाहून लोकशाही प्रक्रियेचा अनोखा अनुभव घेतला. सभागृहातील कामकाज कशा पद्धतीने चालते, लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न कसे मांडतात आणि राज्याच्या विकासासाठी निर्णय कसे घेतले जातात, याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मुंबई भेटीबाबत माहिती देताना आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले की, प्रत्येकालाच मुंबई या शहराचे आकर्षण असते. आयुष्यात एकदा तरी मुंबई पाहण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. या शहरातील अनुभवांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना नवे आयाम मिळतात, स्वप्नांना पंख फुटतात आणि मोठी ध्येये गाठण्याची प्रेरणा मिळते.
जिल्हा परिषदेतील शाळेतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना विविध सभा व विधान परिषदेतील कामकाज दाखवण्यासाठी व मुंबई दर्शन करण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असून मी देखील माझ्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेतील मुलांना घेऊन येण्याचा संकल्प केला असल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उद्गार काढले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदाच मुंबईसारख्या मोठ्या शहरात येतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील आनंद, उत्साह आणि उंच भरारी घेण्याची स्वप्ने खरोखरच प्रेरणादायी असतात. भविष्यात हेच विद्यार्थी उच्च अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी बनून अशाच सभागृहात काम करताना दिसावेत, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला असून, त्यांच्या आनंदात सहभागी होणे समाधानकारक असल्याचेही आमदार पाटील यांनी नमूद केले.
मुंबईत दिलेल्या भेटी :
या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडिया, मंत्रालय, नरिमन पॉईंट, वानखेडे स्टेडियम तसेच विविध राजकीय नेत्यांची शासकीय निवासस्थाने, उद्योजकांचे बंगले, अभिनेत्यांची घरे आणि खाऊगल्ली यांना भेट दिली. मुंबईतील उंचच उंच इमारती पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कुतूहल स्पष्ट दिसून येत होते.

0 Comments