*आज ६ जून*
*शिवराज्याभिषेक दिन*
१३१७ च्या सुमारास दिल्ली सुलतान अल्लाउद्दीनपुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती. यासंपूर्ण भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजी महाराज यांनी पेटविली.
गनिमी काव्याच्या युद्ध तंत्राने महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशा विरुद्ध स्वतंत्र लढा आरंभ करुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयपूर्ती मध्ये अनेक प्रचंड बलाढ्य शत्रुंचे अडथळे शिवाजी महाराजांनी पार केले होते. केवळ हिदुस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील क्रमांक एकचे मोगल सत्ताधीश, दक्षिणेतील भक्कम आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या जोडीलाच गोव्यातील पोर्तुगीज, सुरतेचे इंग्रज, फ्रेंच, जंजिऱ्याचे सिद्धी, कोकणातील छोटी छोटी राज्ये आणि यांच्या जोडीलाच स्वकीयांचेही शिवरायांच्या कार्यात प्रचंड अडथळे होते. पण शिवाजींनी आपल्या सर्व शत्रुंना कुशल युद्धनीतीने नामोहरम करुन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली नि स्वराज्याचेही स्वप्न साकार केले.
स्वराज्याच्या या स्वतंत्र, सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने व स्वकीयांच्या प्रचंड आग्रहामुळे किल्ले रायगडवरती प्राचीन ‘राज्याभिषेका’च्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व बलाढ्य शत्रुंनाही वचक बसविण्यासाठी त्यांनी ६ जून १६७४ रोजी स्वत:स मोठ्या वैभवात राज्याभिषेक करुन घेऊन एक सार्वभौम राज्य निर्माण झाल्याची द्वाही फिरवली.
स्वराज्य निर्माण करुन त्यांनी जर राज्याभिषेकच केला नसता तर ते एक मराठ्यांचे यशस्वी बंड ठरले असते. हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे. या उद्देशाने शिवराज्याभिषेक दिन, विविध उपक्रमाने साजरा केला जातो. ३४४ वर्षानंतरही तरूण पिढीला हा राजा आपला वाटतो. आता गरज आहे ती खऱ्या अर्थाने विचार समजून घेण्याची.....
राजास त्रिवार मानाचा मुजरा !


0 Comments